महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

जातीने नव्हे गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण व्हावा

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; सामाजिक न्याय परिषदेत साधला संवाद

नागपूर-  कोणतीही व्यक्ती जात-पात, धर्माने मोठी नसते, तर तिच्या गुणांनी मोठी होत असते. आपल्याला समाजातील आर्थिक, सामाजिक विषमता दूर करून जातीने नव्हे तर गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण करायचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार, दि. २९ जून २०२५) केले.*

राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेन्शन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. नामदेवराव कांबळे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम, श्री. सुनील किटकरू आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजासाठी जीवन समर्पित केले. सामाजिक न्यायाच्या आधारावर हा समाज सुखी झाला पाहिजे, असे बाबासाहेब म्हणायचे. त्यांच्या संघर्षाचा काळ लक्षात घेतला तर त्यावेळी उपासमारी, गरिबी, अत्याचार, अन्याय मोठ्या प्रमाणात होते. अश्या परिस्थितीत त्यांनी दलित, शोषित, पीडित समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले.’

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आपण संत, महापुरुषांची जात नव्हे, त्यांचे काम बघतो. अनेक डॉक्टर, वकील दलीत समाजातील आहेत. आपण त्यांच्याकडे जाताना जात बघत नाही. कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व हे गुणांमुळे आकाराला येत असते. सामाजिक न्याय, आर्थिक समता प्रस्थापित व्हावी हे बाबासाहेबांना अपेक्षित होते. त्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करावे लागेल. भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीच्या जोरावर समाजासाठी काम करावे लागेल.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button