प्रयोगशील शेती पुरस्कार 2025’ उत्साहपूर्ण वातावरणात प्रदान – वसंतराव नाईक प्रतिष्ठान व वनराई फाउंडेशनचे आयोजन
स्त्रियांनी शेतीकडे वळून कुटुंबाचे रक्षण करावे – कांचनताई गडकरी

नागपूर : –
‘माता’ आणि ‘माती’ या दोनच गोष्टी नवनिर्मिती करू शकतात. चांगले बियाणे मातीत रुजवल्यास त्याचे फळही चांगले, सुसंस्कारीत आणि विषमुक्त मिळते. त्यामुळे कुटुंबाचा महत्वाचा घटक असलेल्या स्त्रियांनी कुटुंब सांभाळताना शेतीकडे वळावे व परसबागेत तयार झालेल्या विषमुक्त भाजांच्या माध्यमातून कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन प्रयोगशील शेती करणा-या सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई गडकरी यांनी समस्त महिलांना केले.
वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनच्या संयुक्त वतीने मंगळवारी सौ. कांचन गडकरी यांना ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी यांच्या हस्ते ‘प्रयोगशील शेती पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. 30 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. एनरीको हाइट्स कन्व्हेन्शन हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते तर मंचावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरदराव गडाख, माजी आमदार व वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलय नाईक, सचिव प्रगती पाटील, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अजय पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.
नितीनजींकडून मिळते मार्गदर्शन
धापेवाडा येथील शेतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विविध प्रयोग करण्याची संधी मिळत असल्याचे कांचनताई गडकरी म्हणाल्या. आईकडून शेतीचा वारसा, सासूकडून मिळालेली कुटुंबाची साथ, सहका-यांचे सहकार्य यासोबतच पाणी, मृदा आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन यामुळे विविध प्रयोग करता आले व त्यात यश मिळाले, असे त्यांनी सांगितले. शेतकरी बांधवांना शेतीमधे विविध प्रयोग करण्याची प्रेरणा मिळावी, त्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने हा पुरस्कार स्वीकारल्याचे सांगत त्यांनी धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पुरस्काराची राशी प्रदान करण्यात येणार असल्याचे घोषणा केली.