अमरावती महानगरपालिकेला “स्वच्छ वायू सर्वेक्षण – 2025” मध्ये देशात प्रथम क्रमांक

अमरावती, दि. 9 सप्टेंबर –अमरावती शहराने पुन्हा एकदा अभिमानास्पद यश मिळवत स्वच्छ वायू सर्वेक्षण – 2025 मध्ये देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ह्या यशामुळे अमरावती शहराचे नाव देशपातळीवर झळकले असून, स्वच्छ आणि निरोगी हवेबाबतचा एक आदर्श मॉडेल म्हणून अमरावतीची नोंद झाली आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र शासनामार्फत दरवर्षी देशातील शहरांमध्ये हवेची गुणवत्ता, प्रदूषण नियंत्रण, हरित उपक्रम व जनसहभाग यावर आधारित मूल्यांकन केले जाते. या मूल्यांकनात अमरावती शहराने सर्वोच्च गुण मिळवत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.
या यशामध्ये अमरावती महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, विविध शासकीय विभाग तसेच शहरातील नागरिकांचा मोठा वाटा आहे. नागरिकांनी प्लास्टिकमुक्त उपक्रम, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण व स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.
महानगरपालिका आयुक्तांनी नागरिकांचे अभिनंदन करताना सांगितले की, “हे यश प्रत्येक अमरावतीकराचे आहे. स्वच्छ आणि निरोगी शहर निर्माण करण्यासाठी प्रशासन आणि जनता यांचा समन्वयच आपल्या या यशाचे खरे गमक आहे.”
या उल्लेखनीय कामगिरीमुळे अमरावती महानगरपालिकेला राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात येणार असून, येत्या काळात अधिकाधिक पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे



