डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कच्या उपोषण मंडपाला अज्ञात व्यक्तींनी लावली आग – सुदैवाने जीवित हानी टळला, हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक

नागपूर : गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षास लवकर न्याय मिळवून आंतरराष्ट्रीय पार्क निर्माण व्हावा याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बचाव कृती समिती नारा येथे गेल्या ३५० दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपाला १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली. या प्रकरणाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बचाव कृती समितीचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
सदर पार्क विजयादशमीला दीक्षाभूमी येथे देश-विदेशातून येणार्या धम्म बांधवांची निवासाची व भोजनासह इतर सोयी सुविधा, भव्य निवासस्थान, शैक्षणिक व आंतरराष्ट्रीय विविध संशोधनात्मक केंद्र निर्माण व्हावे, बाबासाहेब यांचा १३० फूट भव्य असा पुतळा, बौद्ध विद्यापीठ, पालि भाषा संवर्धन केंद्र, ज्येष्ठ बौद्ध भिक्षूसंघाकरिता निवास केंद्र, आरोग्य सुविधा केंद्र, धम्म प्रशिक्षण केंद्र, विपश्यना केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चलचित्र जिवनपट प्रदर्शन केंद्र (म्युझियम) निर्माण व्हावे यासाठी गत वर्षभरापासून नारा या ठिकाणी उपोषण सुरू आहे. मात्र याठीकाणी पार्क निर्माण होऊ नये यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी शेकडो किलो कुजलेले मांस याठीकाणी फेकण्यात आले होते. पार्कला विरोध करणारे उपोषणात सतत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर आता सोमवारच्या मध्यरात्री उपोषण मंडपाला आग लावून जाळण्याचा विफल प्रयत्न केला गेला. सुदैवाने चौकीदाराच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत महामानवांचे फोटो, पेंडॉलचा काही भाग, गाद्या व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले.
समाजबांधवांनी उपोषण स्थळी भेट देऊन अशा प्रकारचे कृत्य करणार्यावर वेळीच कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजबांधवांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बचाव कृती समितीर्चे अध्यक्ष चंदू पाटील यांच्यासह शेकडो अनुयायांनी जरीपटका पोलिस ठाण्याला घेराव करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.




